Mumbai : वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात पार्किंग व्यवस्थेअभावी दुचाकी चालकांची होणारी लूट रोखण्यासाठी भाजपने वेळोवेळी आवाज उठवला. या गंभीर प्रश्नाबाबत भाजप वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी वाहतूक विभाग परिमंडळ २ व ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना १ नोव्हेंबर २०२२ रोजी लेखी निवेदन देऊन पार्किंग व्यवस्था झाल्यावर कारवाई करा अशी मागणी केली होती. यानंतर बारोट यांनी नुकतेच म्हणजेच ८ सप्टेंबर रोजी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून पार्किंगची तातडीने व्यवस्था करावी अन्यथा टोइंग एजन्सीचा ठेका रद्द करण्यात यावा अशीही मागणी केली होती. याप्रश्नी भाजप वसई शहर मंडळातर्फे 15 सप्टेंबर रोजी महापालिका प्रभाग समिती एच समोर निदर्शने करण्यात आली. भाजपची आक्रमक भूमिका पाहून प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेतला आणि वाहतूक विभागाने ५ ऑक्टोबर रोजी वाहतूक अधिसूचना जाहीर करून नागरिकांना या परिसरातील पार्किंग व नो पार्किंग झोनची माहिती दिली. वाहतूक विभागाच्या या घोषणेबाबत नागरिकांची दिशाभूल करून काही लोक श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. श्रेय लाटणाऱ्यांना मनोज बारोट यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले असून भाजप श्रेय लाटण्यासाठी नव्हे तर जनहितासाठी काम करते, असे म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांच्या या गंभीर समस्येबाबत भाजपच रस्त्यावर उतरली होती. नो पार्किंग झोन घोषित करण्याबाबत बारोट सांगतात की, घोषित करण्यात आलेल्या पार्कींग नो पार्किंग झोन मुळे नागरिकांचा संपूर्ण प्रश्न सुटणार नसला तरी काही प्रमाणात दिलासा नक्कीच मिळेल. नो पार्किंग झोन जाहीर करून नागरिकांना व विशेषतः दुचाकी चालकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांबद्दल भाजपने प्रशासन व वाहतूक विभागाचे जाहीर आभार मानले आहेत.